मला माहीत नाही मी काय शोधतोय दिवस-रात्र.
सगळ्या तृष्णा चाळवणारं नक्की ते आहे तरी काय?
दिवसाच्या प्रकाशात दिसलं नाही की रात्रीच्या अंधारात चकाकलं नाही.
माझ्या कवितांच्या सगळ्या वह्या धुंडाळल्या.
माझ्या कल्पना-विश्वातल्या सगळ्या स्त्रियांच्या योनी तपासल्या.
कुठेच कसे नाही?
मला आठवतं लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत
आईला न जुमानता पळून यायचो घरातून भर उन्हात.
कित्येकदा कुणीच नसायचं सोबतीला.
पण तरीही उनाडत राह्यचो गल्लीबोळांत तासोन्तास काहीतरी शोधत.
वय बदलतं तश्या इच्छाही, शोधही, आणि स्थळंही.
पण शोधण्याची खुमखुमी तशीच आणि तेव्हढीच.
तेही कशासाठी ते माहीत नसताना.
गंमतच आहे.
कधी-कधी विचार केल्यावर वाटतं फार झालं.
आता आवरतं घ्यावं जास्त भरकरटण्याआधी.
पण तसं होत नाही.
शिश्नाचं टोक कधी कोरडं-ठक्क राहिल का?
इच्छेचा कलश डुचमळणारच, आज ना उद्या.
कित्येक लहान-सहान आठवणींचे, अभिलाषांचे,
तृप्तींचे, वासनांचे ओझे बाळगून ही मन थकते कुठे?
शोध नकळत होतो प्रवास, जो चालूच राहतो
अष्टौप्रहर, मजल-दर-मजल.
जो पर्यंत संवेदना थकत नाही.
समीर चव्हाण